सातारा : ‘मराठी भाषेला प्राचीन वारसा असून मराठीचे वैभव जपणे व संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळावी. यासाठी संपूर्ण देशभरात राहणाऱ्या मराठी भाषकांनी ध्यास घेऊन एकजुटीने प्रयत्न करायला हवेत,’ असे प्रतिपादन गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी केले. गोव्यातील ताळगावच्या माधव राघव प्रकाशनने मिरामार (पणजी) येथील यूथ हॉस्टेलमध्ये आयोजित केलेल्या एकदिवसीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
या वेळी उद्घाटक म्हणून पत्रकार प्रभाकर ढगे व प्रमुख वक्ते म्हणून दै. नवप्रभाचे संपादक परेश प्रभू, कवियत्री चित्रा क्षीरसागर, प्रकाश क्षीरसागर उपस्थित होते.
महाराष्ट्र, तसेच सीमाभागातील साहित्य चळवळीसह गोव्यातील मराठी साहित्य परंपरेतील संत सोहिरोबानाथ आंबिये यांच्यापासून आजतागायतच्या काव्यपरंपरेचा आढावा डॉ. चेणगे यांनी घेतला. बा. भ. बोरकर, शंकर रामाणी यांचा उल्लेख त्यांनी केला. ‘अनेक साहित्यिकांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे, महाराष्ट्राच्या बाहेरही मराठीच्या जतन-संवर्धनासाठी तळमळीने प्रयत्न होत आहेत. त्याची दखल मराठीच्या मुख्य प्रवाहाला घ्यावी लागेल,’ असे विचार त्यांनी व्यक्त केले.
‘मराठी भाषेमुळेच महाराष्ट्र, कर्नाटकातील सीमाभाग व गोवा यांच्यातील संबंध दृढ आहेत. गुंफण अकादमीने महाराष्ट्र, गोवा, तसेच सीमा भागातील मणतुर्गे, जांबोटी, कावळेवाडी आदी परिसरात मराठी साहित्य संमेलने घेतली आहेत. शिवाय सीमाभागात वाचनालये सुरू करून वाचन संस्कृतीच्या संवर्धनाचे काम अकादमी करीत आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली.
प्रमुख वक्ते प्रभाकर ढगे यांनी माणसामाणसांतील सुसंवाद हरवला आणि हरपल्याचे सांगून, मोबाईलवर प्रत्येक जण संवाद करतो;परंतु समोरासमोर पाठ फिरवत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ‘मराठी नाटकाची आणि संगीत नाटकाची परंपरा गोव्यातूनच सुरू झाली. कृष्णंभट्ट बांदकरांनी लिहिलेल्या नाटकापासून अण्णासाहेब किर्लोस्करांनी प्रेरणा घेतली होती,’अशी माहिती त्यांनी दिली. गोव्यातील मराठी भाषेच्या परंपरेचा इतिहास त्यांनी आपल्या भाषणातून मांडला. ‘पत्रकारितेतही गो. पु. हेगडे देसाई अर्थात भारतकार हेगडे देसाई यांच्या वर्तमान पत्राने त्याकाळात खळबळ माजवली होती,’ असेही त्यांनी सांगितले.
परेश प्रभू यांनी आपल्या भाषणात गोमंतकीय मराठी कवितेची वाटचाल उलगडली. ते म्हणाले, ‘गोमंतकीय मराठी कवितेचे चार टप्पे पडतात. त्यात संतकवी फार नसले तरी सोहिरोबानाथ आंबिये, कृष्णदास श्यामा, कृष्णंभट्ट बांदकरांचे योगदान मोठे आहे. विठ्ठल केरीकर यांच्या लेखनाचा शोध वि. बा. प्रभुदेसाई, प्रियोळकरांनी यांनी घेतला, तर कृष्णदास श्यामा यांच्या श्रीकृष्ण चरित्राच्या तीन ज्ञात प्रती येथील सेंट्रल लायब्ररीत म्हणजेच कृष्णदास श्यामांच्या नावाने ख्यात राज्य वाचनालयात पाहावयास मिळतात.’ ‘पोर्तुगिजांनी येथील मराठी ग्रंथांचा दहनोत्सव केल्याने येथील जुने साहित्य राख झाले,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने दै. सामनाचे सातारा जिल्हा प्रतिनिधी गजानन चेणगे, गंगाखेड (जि. परभणी) येथील नंदकुमार भरड, सुनीता घाडगे, रमेश जाधव, चंद्रकांत जंगले, प्रमोद कवठेकर व परभणी येथील गणेश वायचळ यांचा त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला.
‘गोव्यात अरुण नाईक, शांता लागू, विद्या नाडकर्णी आणि अस्मादिक (लक्ष्मण पित्रे) आदी विडंबनकार आहेत. त्यांचा उल्लेख कवितेचा आढावा घेताना केला जात नाही,’ अशी खंत लक्ष्मण पित्रे यांनी व्यक्त केली.
दुपारच्या सत्रात विडंबनकार लक्ष्मण पित्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात विंदा नाईक, नजराना दरवेश, विनोद नाईक, नीमा आमोणकर, स्वाती चेणगे, छाया कुलकर्णी, सुनीता घाडगे, चित्रा क्षीरसागर, प्रकाश क्षीरसागर आदिंनी कविता सादर केल्या. बहारदार सादरीकरण व त्याला उपस्थितांकडून मिळालेली दाद यामुळे हे संमेलन रंगतदार झाले.